मुंबई प्रतिनिधी
भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे - मंत्री अतुल सावे
राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध अंबडगोड असले तरच लोकशाही टिकून राहील - राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे
पत्रकार संघटना ही पत्रकारांना आधार देण्यासाठीच - प्रदेश संघटक संजय भोकरे
पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन ऐतिहासिक झाल्याने मराठवाड्यातील पत्रकारांना मिळाली नवसंजीवनी
परिसंवादातून दिग्गज वक्तव्यांनी मांडली परखड मते, विभागीय अधिवेशनाला राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती !
छत्रपती संभाजीनगर / कुंडलिक वाळेकर
मराठवाड्याचे विभागीय केंद्र असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथे ज्या प्रकारे सर्व शासकिय कार्यालये आहेत. त्याच पध्दतीचे एक विभागीय पत्रकार भवन बांधण्यासाठी शासन जागा उपलब्ध करुन देईल आणि ते बांधून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या मराठवाडा विभागाच्या वतीने संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या भव्य दिव्य अशा रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनामध्ये सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ही महत्वपुर्ण घोषणा केली. तर पत्रकारांनी केलेले वार्तांकन वाचकांच्या ज्ञानात नेहमीच भर घालणारे असल्याने भारतीय माध्यम क्षेत्र अधिक सक्षम झाले पाहिजे अशी अपेक्षा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली. तर राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध जर अंबड गोड असले तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून राहील असे परखड मत पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले. आणि पत्रकारांना आधार देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना कार्यरत असल्याचे मत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगर येथील संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी थाटामाटात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रातील परिसंवादाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माध्यमांचा डी एन ए कोणता ? या विषयावरील हा परिसंवाद देशपातळीवर गाजावा अशा पद्धतीने सादर झाला. या परिसंवादामध्ये सहभागी झालेले संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य,एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, नवी दिल्ली येथील पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे,पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे,प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे,अँड. महेश भोसले, माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे या विचारवंतांना बोलत करणाऱ्या परिसंवादाच्या संवादिका अश्विनी सातव - डोके यांनी परिसंवादामधून विचारांचे मंथन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व्यक्त केले.
या बहारदार ऐतिहासिक रौप्य महोत्सवी विभागीय अधिवेशनाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना.अतुल सावे, आ.संजय किणीकर,आ.प्रदिप जयस्वाल, मा. महापौर नंदकुमार घोडेले,संभाजीनगरचे मनपाचे आयुक्त जी.श्रीकांत,प.पू.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.जयदिप कवाडे, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे संस्थापक संजय भोकरे, एबीपी माझाच्या संपादक सरीता कौशिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, पत्रकार संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश समन्वयक नितीन शिंदे प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य निवड समितीचे अध्यक्ष रुपेश प्रमुख महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ब्रँड अँबेसिडर संजय फुलसुंदर नाशिक विभागीय संपर्कप्रमुख विजय शेळके मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर छबुराव टाके दिव्य लोकप्रभाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर मराठवाडा संपर्कप्रमुख कुंडलिक वाळेकर आदिंची सत्कारमूर्ती ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, संपादक शेख मुजीब आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मराठवाडा भुषण पुरस्कार वितरण समारंभात प्रास्ताविक करताना मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा ज्यांच्या संकल्पनेतून आणि अथक परिश्रमातून हे नेत्रदिपक अधिवेशन संपन्न झाले ते संपादक अनिल सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई ही तमाम पत्रकारांची मातृसंस्था असून या संस्थेच्या निर्मितीला 25 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल पहिले विभागीय अधिवेशन घेण्याचा मान पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या आग्रहास्तव संतभूमी असलेल्या मराठवाड्याला मिळाला. या विभागातील सर्व जिल्हा संस्थांच्या पदाधिकार्यांनी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल अनिल सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले,पत्रकारांनी समाजातील फक्त दोष पाहून चालणार नाही. तर चांगले काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांना लेखनीचे बळ दिले पाहिजे. याच उद्देशाने मराठवाडा भुषण पुरस्काराचे वितरण आम्ही करत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बोलतांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकारांचे सामाजिक दायित्व काय आहे ? या विषयी सखोल मार्गदर्शन केले. लेखनीच्या माध्यमातून असे कार्य करा ज्यामुळे तुमच्या पुढच्या पिढीला निरंतर प्रेरणा मिळत राहिल.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ हा पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम तर करतच आहे. त्याच बरोबर वृत्तपत्र क्षेत्राशी संबंधित प्रत्येक घटकाला या संघटनेने कायम आधार दिलेला आहे. कोरोना काळात या पत्रकार संघाने जे काम केले त्याची शासनाने सुध्दा दखल घेतल्याचे संजय भोकरे यांनी सांगितले. राजकिय नेत्यांच्या कामाचे मुल्यमापन करताना ज्या वेळी आपण त्यांचे दोष दाखवतो तेव्हा त्यांनी या क्षेत्रात केलेल्या संघर्षाचा आणि दिलेल्या योगदानाचा विचार सुध्दा पत्रकारांनी केला पाहिजे असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे अत्यंत उत्कृष्ट असे विभागीय अधिवेशन घेतल्याबद्दल संजय भोकरे यांनी पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांचे विशेष कौतुक करत प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे,विभागीय अध्यक्ष अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष डॉ.छबुराव ताके आणि सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले.
या कार्यक्रमात बोलतांना ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी राज्यकर्ते आणि प्रसार माध्यम यांचे संबंध अंबटगोड असले पाहिजेत तरच लोकशाही टिकून राहिल असे सांगितले. हे संबंध अधिक गोडही असू नयेत आणि अधिक अंबटही असू नयेत.आजकाल अनेक राजकिय नेते हे पत्रकारांची आम्हाला भिती वाटते असे बोलत असतात. वास्तविक भिती वाटेल असे जर आपण काहीच केले नाही तर पत्रकारांनाच काय ? कोणालाही घाबरण्याचे कारण नसते असेही वानखेडे म्हणाले. जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक विषयांवर त्यांनी अभ्यासपुर्ण विवेचन केले.
प.पू.1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे मौनव्रत असल्यामुळे त्यांच्या वतीने श्री.स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी अत्यंत अभ्यासपुर्ण आणि दिलखुलास असे मनोगत व्यक्त केले. आ.संजय किनीकर, मुंबई येथून खास अधिवेशनासाठी आलेल्या एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांनीही परखडपणे आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी पुढे बोलतांना राज्याचे मंत्री अतुल सावे म्हणाले की, अलिकडच्या काळात पत्रकारांशी आमचा दररोज संवाद असतो. कधी कधी दिवसातून तीन-चार वेळा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांविषयी नेहमीच आदर राहिलेला आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला दररोज वृत्तपत्र वाचन करण्याची सवय लावली. तेच संस्कार आम्ही आमच्या पुढच्या पिढीवर सुध्दा करत आहोत. या माध्यमातून माहिती बरोबरच आपल्या ज्ञानात सुध्दा भर पडते असे ते म्हणाले. पत्रकार संघाच्या विभागीय अधिवेशनाला त्यांनी मनस्वी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पुढे बोलतांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, गेली 42 वर्ष मी राजकारणात आहे. मंत्रीपदापर्यंत पोहचण्यासाठी जे कष्ट करावे लागले, परिश्रम घ्यावे लागले, संघर्ष करावा लागला तो पत्रकारांनी जवळून पाहिला पाहिजे. पत्रकारांना सुध्दा असेच खडतर आयुष्य जगावे लागते.प्रामुख्याने वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांची अवस्था कधी कधी पहावत नाही. कुटुंबाला वेळ न देता,तहान,भुक हरवून हे लोक 24 तास बातमीसाठी काम करत असतात. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक विभागीय पत्रकार भवन असावे या मागणीची दखल घेवून ना.शिरसाट यांनी शासनामार्फत जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन तर दिलेच शिवाय हे अद्यावत विभागीय पत्रकार भवन बांधून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल असा शब्द देखील तमाम मराठवाड्यातील आणि राज्य स्तरातून आलेल्या पत्रकारांच्या समक्ष दिला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यापीठाचे प्रसिद्धी प्रमुख संजय शिंदे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांनी बहारदारपणे करत कार्यक्रमाची उंची वाढवली. तर पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक दायित्वाचे विस्तृत वर्णन करत पत्रकार संघटना ही पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी एकमेव संघटना असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणारे संघटना असल्याचे स्पष्ट घरात मराठवाडा विभागीय अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, विभागीय अध्यक्ष अनिल सावंत यांच्या टीमचे कौतुक करत या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेल्या पत्रकार संघाच्या तमाम पदाधिकारी, सदस्य, राज्यभरातून आलेले पत्रकार बांधव भगिनी, पत्रकार प्रेमी नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष देवीदास कोळेकर,जिल्हा उपाध्यक्ष भांबर्डे, मराठवाडा सल्लागार विलास इंगळे,सह सचिव मनोज पाटणी, सचिव महेंद्र डेंगळे,प्रसिध्दी प्रमुख सचिन अंभोरे, संपर्क प्रमुख सुजीत ताजणे,सह सचिव रविंद्र लांडगे, ज्ञानेश्वर तांबे,संतराम मगर,आनंद अंभोरे, माधव खिल्लारे, गोपाळजी पटेल,लक्ष्मीनारायण राठी, राजू परदेशी आदिंनी परिश्रम घेतले.
संत एकनाथ रंगमंदिर येथे संपन्न झालेले पत्रकारांचे हे विभागीय अधिवेशन न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाचे होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या स्थापनेला 25 वर्ष पुर्ण झाल्या नंतर मराठवाडा विभागामध्ये होणारे पहिले हे रौप्य महोत्सवी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
मराठवाडा भूषण 2025 या पुरस्काराचे हे ठरले मानकरी...
मराठवाड्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या मान्यवरांना मराठवाडा भुषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये वरिष्ठ सनदी अधिकारी जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगर भाजपाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, सा.बां.विभागाचे पुणे येथील मुख्य अभियंता अतुल चव्हाण, चंद्रसेन कोठावळे, जयंती कठाळे, चला हवा येऊ द्या मधील प्रसिद्ध हास्य अभिनेता योगेश शिरसाट,प्रशांत गिरी, अशोक देशमाने, बीड येथील सायं दैनिक सिटीजनचे संपादक शेख मुजीब,अरुण पवार, हनुमंत भोंडवे, मधुकर अण्णा वैद्य, लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, सचिन चपळगावकर, शिवराज बिचेवार,आशा शेरखाने, कटके,गणेश गायकवाड,प्रशांत गिरे, सुनिल देवरा,बी.एस.स्वामी,मधुकर सावंत,राजेंद्रसिंह सुर्यवंशी यांना व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मराठवाडा भूषण 2025 या मानाच्या पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
पत्रकार संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उत्कृष्ट संघटक पुरस्काराने केले सन्मानित...
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पदाधिकार्यांना उत्कृष्ट संघटक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये दशरथ चव्हाण (नवी मुंबई), दत्ता घाडगे (अहिल्यानगर), भगवान चंदे (ठाणे), राजेंद्र कोरडे पाटील(सोलापुर), स्वामीराज गायकवाड, नयन मोंढे (अमरावती), राकेश खराडे(रायगड), किशोर रायसाकडा(जळगाव), जितेंद्रसिंह राजपुत (उत्तर महाराष्ट्र), नितीन शिंदे (पश्चिम महाराष्ट्र), चंद्रकांत पाटील (कोल्हापुर),संजय पडवळ (ठाणे शहर),संजय फुलसुंदर, राहुल फुंद (शिर्डी), गणेश सुरजसे (अकोला), अनुपकुमार भार्गव (वर्धा), लक्ष्मण डोळस (नाशिक), निलेश सोमाणी (वाशिम),दत्तात्रय राऊत(जामखेड) आदिंना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघटक पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
ऑगस्ट मध्ये वाशिमला होणार अधिवेशन...
ज्या प्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने मराठवाडास्तरीय भव्य दिव्य अधिवेशन पार पडले. त्याच पध्दतीने येत्या ऑगस्ट महिन्यात विदर्भ विभागाच्या वतीने वाशिम येथे अशाच पध्दतीचे अधिवेशन घेणार असल्याचे निलेश सोमाणी यांनी जाहिर केले. तसेच या अधिवेशनाला मराठवाड्यासह राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांना देखील निमंत्रीत केले.
एखाद्या मोठ्या सेलिब्रेटीपेक्षाही संजय भोकरे साहेबांचे व्यक्तीमत्व पत्रकारांना मोहिनी घालणारे ठरले..!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रदेश संघटक संजय भोकरे यांनी संपुर्ण राज्यात पत्रकारांचे संघटन उभे केले आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा हा तर संजय भोकरे साहेबांचा बालेकिल्ला करण्यामध्ये पत्रकार संघाचे माजी मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा विद्यमान प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांचे अनमोल योगदान ठरले आहे.छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अधिवेशनात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर सह बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना या आठही प्रत्येक जिल्ह्यातून 100 ते 150 ग्रामीण पत्रकार स्वखर्चाने आले होते. संत एकनाथ रंगमंदिर फक्त पत्रकारांच्या उपस्थितीने भरल्याचे चित्र पहिल्यांदाच प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्या समन्वयामुळे पहायला मिळाले. या अधिवेशनामध्ये नामवंत पत्रकारांना पुरस्कार देवून संघटनेने आपले उत्तरदायित्व निभावले. त्यामुळे एकूणच हा सर्व कार्यक्रम संपल्यानंतर संजय भोकरे साहेबांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी शेकडो पत्रकारांची अक्षरश: झुंबड उडाली होती. एखाद्या मोठ्या सेलिब्रेटीपेक्षाही भोकरे साहेबांचे व्यक्तीमत्व पत्रकारांना मोहिनी घालत होते.
पत्रकारांचा डीएनए कोणता या विषयावर झालेला परिसंवाद राष्ट्रीय उंची देणारा ठरला ?
भारतीय पत्रकारांचा डीएनए नेमका कोणता या परिसंवादात जोरदार विचार मंथन झाले.अधिवेशनात सकाळच्या सत्रात अभ्यासू पत्रकार आणि विधीतज्ञांच्या उपस्थितीत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.पत्रकारांचा डीएनए कोणता ? या विषयावर झालेल्या परिसंवादात नवी दिल्लीतून आलेले खास पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अशोक वानखेडे, पत्रकार संघाचे संस्थापक तथा प्रदेश संघटक संजय भोकरे, मुंबईतून आलेल्या खास एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर अण्णा वैद्य, प्रसिद्ध विधीज्ञ अॅड.महेश भोसले, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे आणि माजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे सहभागी झाले होते. या सर्वांच्या चर्चेतून अत्यंत प्रभावी असे विचारमंथन झाले. ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून मोती बाहेर निघाले त्या प्रमाणे या विचार मंथनातून पत्रकारांच्या बुध्दी चातुर्याचे मोतीच बाहेर पडत होते.पत्रकारांचे भावविश्व हे राजकारण आणि राजकिय सत्ता एव्हढ्यापुरते मर्यादित न राहता समाजातील खरे प्रश्न,साहित्य,कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात विस्तारले गेले पाहिजे.तरच पत्रकारांचा डीएनए हा त्यांच्या कर्तव्याची पुर्तता करु शकेल. ग्रामीण भागातील पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी,जाहिरातीसाठी विचार स्वातंत्र्यावर होणारे अतिक्रमण, ब्रेकिंग न्युजच्या आणि टिआरपीच्या हव्यासापोटी अपप्रवृत्तींचा वाढलेला प्रादुर्भाव या सर्वच विषयांवर परिसंवादात साधकबाधक मीडियाला दिशा देणारी चर्चा झाली.
पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव...
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे रौप्य महोत्सवी मराठवाडा विभागीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या प्रतिसादाला मराठवाडा विभागीय अध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. छबुराव ताके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे, अभयकुमार दांडगे, प्रदेश निवड समितीचे प्रदेशाध्यक्ष रुपेश पाडमुख आदींनी प्रतिसाद देऊन हे अधिवेशन ऐतिहासिक करत यशस्वीरित्या संपन्न केल्याबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे, पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी सर्व टीमचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले. कार्यक्रमानंतर या टीमवर अक्षरशः अभिनंदनचा वर्षाव झाला.
मराठवाड्यातील जिल्हाध्यक्षांचा झाला गौरव...
पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय रौप्य महोत्सवी अधिवेशन यशस्वी करण्यामध्ये यशस्वी परिश्रम घेणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्हाध्यक्षांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. छबुराव ताके, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शांताराम मगर, जालना जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, परभणीचे जिल्हाध्यक्ष दिलीप माने, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष गजानन मगर, नांदेडचे जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे, उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष निळकंठ मदने, निवड समिती नांदेडचे किशोर पवार, लातूरचे जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे उपाध्यक्ष अशोक देडे, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष अमजद खान तसेच बीड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अँड विनायक जाधव,महिला जिल्हाध्यक्ष आयेशा शेख, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख ताहेर, बीड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दीपक काळकुटे,डिजिटल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल आगुंडे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व महानगरीचे अध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्वप्रमुख पदाधिकाऱ्यांचे व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment
0 Comments